
रामदास तांबे
पुणे: “आजच्या 12-13 वर्षांच्या उमलत्या बाल कवी-कवयित्रींच्या पिढीत उद्याचे शांता शेळके, इंदिरा संत, कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकर दिसतात. 2035 पर्यंत कविता अधिक प्रगल्भ व्हावी, यासाठी या युवा प्रतिभांना सातत्याने व्यासपीठ मिळाले पाहिजे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी आणि वर्ल्ड पोएट्री संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष डाॅ. मधुसूदन घाणेकर यांनी केले.
वर्ल्ड पोएट्री संस्थेच्या वतीने आयोजित निमंत्रित कवी-कवयित्रींच्या विशेष काव्यसंमेलनात ते अध्यक्षीय भाषण देत होते. संमेलनाचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय बालकवयित्री अजया मुळीक हिच्या हस्ते पार पडले. यावेळी तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा प्रिया दामले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
संमेलनात सहभागी कवी-कवयित्रींना 2025 च्या वर्ल्ड पोएट्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संमेलनाचे औचित्य साधून डॉ. घाणेकर यांच्या संपादनाखालील ‘डहाळी’ या विश्वविक्रमी अनियतकालिकाच्या 670व्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
बाल कवयित्रींच्या प्रतिभेला दाद
बाल कवयित्री अजया मुळीक हिने उद्घाटन प्रसंगी सांगितले, “मला कवितेमुळे खूप आनंद मिळतो, आणि मी अधिक चांगली कविता करण्याचा ध्यास घेईन.” तिच्या “पैशाला नसते जात, पैशाला नसतो धर्म” या कवितेला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
यावेळी वसुधा नाईक, अनघा सावनूर आगाशे, मंदाताई नाईक, सारिका सासवडे, प्रीति दबडे, मनीषा ठाकूर, प्रतिमा काळे, दीपराणी गोसावी, भावना गुप्ता, बाबा ठाकूर, योगेश हरणे, गौरव पुंडे, विनोद अष्टूळ, शामला पंडित, धनंजय इंगळे, श्रीराम घडे आदी 25 कवी-कवयित्रींनी धुलीवंदनाच्या काव्यसंध्येला रंगत आणली
समारोपाच्या क्षणी डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या “इंद्रधनुष्याला सात रंग, पण मनाला हजार रंग” या कवितेने संमेलनाच्या भावविभोर वातावरणात रंग भरला.
साहित्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक संकेत
संमेलनात कवी-लेखकांनी एकमताने मत व्यक्त केले की, कोवळ्या काव्यपिढीवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे, जो भावी साहित्य क्षेत्राच्या उत्कर्षाचा सकारात्मक संकेत आहे.
संमेलनाचे संयोजन सारिका सासवडे यांनी केले, तसेच त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.