
पुणे: सर्वसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर आणि गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या सरपंचांचा सन्मान आदर्शवत आणि उदयोन्मुखांना दिशादर्शक ठरेल,असा विश्वास सुप्रसिद्ध मराठी व हिंदी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केला.ग्रामगौरव मीडिया फाऊंडेशन आणि अ.भा.सरपंच परिषद यांच्या विद्यमाने तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या व इन्फनाइट मल्टीस्टेट को.ऑप क्रेडिट सोसायटीच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ‘ग्राममर्मी’ सन्मान सोहळा येथील श्री गणेश कला क्रीडा मंच येथे दिमाखदारित्या पार पडला.सोनाली कुलकर्णी यांनी ग्रामीण महाराष्ट्राची खरी नस असलेल्या पुणे जिल्ह्यातील गावकारभाऱ्यांचे सन्मान जाहीर केले.अध्यक्षस्थानी कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव मगर हे होते.
समारंभाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांच्या प्रतिमापूजनाने सेवानिवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्याहस्ते झाले. यावेळी सन्मानपिठावर दौंडचे आमदार तथा महाराष्ट्र विधिमंडळ सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष अँड. राहुल कुल, अ.भा.सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील,ज्येष्ठ पत्रकार व जागतिक साखर उद्योगाच्या तुलनात्मक अभ्यासावर आधारित ‘ऊस : ब्राझीलचा- भारताचा’ या पुस्तकाचे लेखक दत्ता सावंत,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद,भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार,इन्फानाइट मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे संचालक प्रसाद देशमुख व विनायक मराठे,उद्योजक निलेश ढेरे,पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रदीप माने-पाटील,बारामती येथील चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज फेम रामभाऊ जगताप व सुभाष मदने हे कलाकार आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मिळाली ऊर्जा :
समारंभाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ.शंकरराव मगर यांनी कृषी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी पथदर्शी कार्यक्रम प्रत्येक गावकारभारी यांनी तयार करून ग्रामस्थांच्या मदतीने त्याची काटेकोर अंमलबजावणी कशी होईल यासाठी कसोशीने काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. ग्रामसंवाद मेळावा व ग्राममर्मी सन्मान सोहळा आयोजनामागील भूमिका प्रास्ताविकामधून ग्रामगौरव मीडिया फाउंडेशनचे संस्थापक संपादक विवेक ठाकरे यांनी विषद केली. उद्घाटक माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आपल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या गावी राबविलेल्या विविध योजना व गावाचा साधलेला विकास मांडला. ग्रामविकास साधतांना मूलभूत, भौतिक व आर्थिक सुबत्त गाव अशा तीन स्तरावरून कामांचे नियोजन केले पाहिजे असे आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.केंद्र व राज्य शासनाच्या नगरविकास व ग्रामविकास विभागाच्या योजना या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने राबवल्या जात असताना शहरातील व ग्रामीण भागातील लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुदान मिळत असल्याने फरक दाखवून देतात,अशी खंत अनेक सरपंचांनी बोलून दाखवली. सरपंचांच्या मनातील याच अपेक्षेचा धागा पकडत सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शहरी भागाला ‘इंडिया’ व ग्रामीण भागाला ‘भारत’ अशी जी ओळख निर्माण झाली आहे, यातील फरक मिटवण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजे अशी मागणी विचारपिठावरून केली.
ग्राममर्मी विशेष सन्मान :
रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वेस्ट वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमाला पेटंट म्हणून केंद्र शासनाची मान्यता मिळवून आणणारे आमदार अँड.राहुल कुल यांना ग्राममर्मी आमदार भूषण तर ग्रामीण भागाला अर्थसाक्षर करण्याचे गेल्या कित्येक वर्षापासून काम करणारे इन्फानाइट मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन नवनाथ आवताडे यांना ग्राममर्मी आर्थिक सल्लागार भूषण व वक्ता महाराष्ट्राचाहे अभियान राबवणारे बालाजी जाधव यांना ग्राममर्मी वक्तृत्वभूषण असे विशेष सन्मान डॉ.शंकरराव मगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
निवड करण्यासाठी लागला कस :
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक अशा 13 ग्रामपंचायती, सरपंच,ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक),पंचायत समिती विस्तार अधिकारी,महिला बचत गटात दिल्या जाणाऱ्या अशा 65 आणि जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रत्येकी 3 अंगणवाडी सेविका, आशा सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी,फार्मर प्रोड्यूसर कंपन्या अशा विविध 83 पुरस्कारसाठी एकूण 930 नामांकने दाखल झाली होती.पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी जिल्हा परिषदेने हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भूषण जोशी,ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी संजय शिंदे व ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल घोळवे अशी त्रीसदस्य समिती जाहीर केली होती.अत्यंत कर्तबगार व एकापेक्षा एक सरस असे नामांकन प्रस्ताव असल्याने निवड करताना समितीचा कस लागला होता. निवड झाली असली तरी ऐनवेळी कार्यक्रमातच सन्मान जाहीर होणार असल्याने सोहळ्यात पुरस्कारार्थीमध्ये क्षणोक्षणी उत्सुकता वाढल्याचे दिसून आले.
गावकारभारी स्वागताने भारावले :
पुरस्कारासाठी नामांकन सादर केलेल्या सर्वांनीच कार्यक्रमाला उपस्थिती दिली होती.सर्व उपस्थित मान्यवर गावकारभाऱ्यांना रेड कार्पेटच्या पायघड्या अंथरून, डोक्यावर फेटे बांधून आणि पारंपारिक औक्षण व ओवाळणी करून अत्यंत दिमाखात स्वागत करण्यात आले.अत्यंत सुबक व आकर्षक सन्मानपत्र,भारतीय संविधान, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता,वडाचे रोपटे असे सन्मानाचे स्वरूप होते.दुपारी 1 वाजता सुरु झालेला हा सन्मान सोहळा तब्बल 7 वाजेपर्यंत म्हणजे सहा तास चालला.आपल्या गावांना समृद्ध करण्यासाठी आणि गावाच्या विकासासाठी अहोरात्र मेहनत करणारे सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामपंचायत अधिकारी आणि पंचायत समित्यांमधील पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी अशा सर्व घटकांच्या पुरस्कारार्थीना पहिल्यांदाच अशा पद्धतीने गौरवण्यात आल्याने कार्यक्रमात प्रचंड उत्साह दिसून आला.पुणे जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी युनियन व विस्तार अधिकारी संघटना यांनी मोलाचे सहकार्य केले.
समारंभ यशस्वीतीसाठी यांचे लाभले योगदान :
ग्राममर्मी सन्मान सोहळ्याच्या मुख्य संयोजिका कु. भाग्यश्री विवेक ठाकरे यांनी नियोजन केलेल्या या दिमागदार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका शिल्पा देशपांडे,शब्द जादूगार डॉ.सुनील धनगर, बालाजी जाधव व बारामती येथील ज्येष्ठ पत्रकार अनिल सावळे- पाटील यांनी तर आभार ग्रामगौरव मीडियाच्या कार्यकारी संपादक कु.धनश्री ठाकरे यांनी मानले.कार्यक्रमाला अ.भा. सरपंच परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे,ग्रामगौरव फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सौ.मनीषा ठाकरे,सरपंच परिषदेच्या महिला नेत्या सौ. प्रसिद्धीताई जयंत पाटील,ग्रामगौरव मुंबई मंत्रालय ब्युरो हेड किरण वाघ, पुणे ब्युरो चीफ जयश्री बोकील, पुणे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब काळे,महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई गोकुळे,ग्रामगौरव फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सुरज फडके, तंत्र सल्लागार विरेंद्र पाटील,बबन फडके,राज्य संघटक सचिन जगताप,एस.डी. इव्हेंटचे दिनेश थोरात,जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे,वाय.डी. पाटील,नारायण माळी,गौरव रणदिवे, दस्तगीर खाटीक,आकाश भंगाळे, गौरव ठाकरे यांच्यासह डॉ.डी.वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी समन्वयक तर अजिंक्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी नियोजनात परिश्रम घेतले.