Skip to content
May 12, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Reporter News

Reporter News

Today's News Tomorrow's Future

Primary Menu
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Live
  • Home
  • दादा ग्लानीत झोपला तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…माधुरी चव्हाण (सैंदाणे) यांचा लेख
  • Marathi News

दादा ग्लानीत झोपला तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…माधुरी चव्हाण (सैंदाणे) यांचा लेख

admin April 22, 2025
दादा ग्लानीत झोपला तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…माधुरी चव्हाण (सैंदाणे) यांचा लेख
Views: 285
2 0
Spread the love
           

Read Time:17 Minute, 13 Second

या वर्षातील दादाची ३९ वी पुण्यतिथी.🙏

[माझा सर्वात मोठा भाऊ]

(कै. महेश आत्माराम सैंदाणे.

जन्म दि.३०-०३-१९६९,

स्वर्गवास दि.०८-०४-१९८६)

दि.०८ एप्रिल १९८६ रोजी कै.दादाचे तोरणा गडावरून पडून अपघाती अकस्मात मृत्यू झाला होता. त्यावेळी सिंहगड, राजगड, पुरंदर, तोरणा व रायगड अशी एकाच वेळी पाच किल्ल्यांवर सात/आठ दिवसांत दुर्गभ्रमंती करण्याचा पाच मित्रांचा मानस होता. त्यापैकी अठरा वर्षाच्या आतील या पाचही मुलांनी सिंहगडापासून सुरवात करून राजगड, पुरंदर सर करून चौथा किल्ला तोरणा गडावर गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी गेले होते. दि.०९ एप्रिल १९८६ रोजी गुढी पाडवा होता. त्यादिवशी तोरणा गडावर गुढी उभारून पुढील पाचवा किल्ला रायगडावर जाण्याचे त्यांचे नियोजन होते. परंतु नियतीच्या मनात काही वेगळे असल्याने या युवकांचा मनसुबा उधळून लावला गेला. तोरणा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अवघा दिडदोन तासांचा अवधी बाकी असतांना काळाने घात केला. वर जाण्यास दोन वाटा होत्या. एक फक्त दिसायला अवघड, परंतु वाटचालीस सोपी. व दुसरी दिसायला सोपी परंतु मार्गक्रमणा करण्यास अवघड. या दोन्ही वाटांमध्ये मित्र विभागले गेले. प्रत्येकाला गडाच्या टोकावर लवकर पोहोचण्याची आतुरता होती. कै. दादाने दिसायला अवघड परंतु वाटचालीस सोपी अशी वाट निवडली. काही अंतर चालून गेल्यानंतर दादाचा पाय घसरला. खाली पडत असतांना त्याने झाडाला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने एप्रिलच्या कडाक्याच्या उन्हात गडावरील आधारासाठी पकडलेले झाड मुळासकट उपटून दादाच्या हातात आले. आणि दादा २५० फूट खोल दरीत दगडांवर आपटत आपटत कोसळला. खाली पडत असतांना जोरात ‘राजा’ नावाच्या मित्राला हाक मारली. थोड्याच वेळात उर्वरित चारही मित्र दादा पडला होता तीथे गोळा झाले. पडत असतांना दादाला खूप मार लागला होता. विशेष करून मेंदूला मार लागला होता व डाव्या हाताचे हाड बाहेर आले होते. तो खूप घामेजला झाला होता व रक्तस्त्रावही खूप झाला होता. त्यावेळी त्याला खूप गरम होत असल्याने त्याने मित्रांना त्याचा शर्ट काढायला सांगितला पण हाताचे हाड बाहेर आल्याने ते शक्य नसल्याने मित्रांनी फक्त त्याच्या शर्टाची बटणे काढून शर्ट मोकळा केला. त्याच्या पायातील बूट व मोजेही काढले. त्याला ऊन लागत असल्याने त्याच्या दोन मित्रांनी सावलीसाठी त्याच्या अंगावर चादर धरली व उर्वरित दोन मित्र खाली धावले. असं झाल्याने सगळेच खूप घाबरले होते. दादाला तहान लागल्याने मित्रांनी त्याला थोडे पाणी पाजले. दादा जेथून खाली पडला होता तेथून तोरणा गडावर पोहोचण्यास केवळ अर्ध्या तासाचं अंतर बाकी राहिलं होतं. पाणी पिऊन झाल्यावर दादा मित्रांना म्हणाला होता, मला जरा दमल्यासारखं वाटतंय, मी थोडा वेळ झोपतो, म्हणजे मला बरं वाटेल मग आपण थोडाच राहिलेला किल्ला चढून वर जाऊ व आपलं ठरल्याप्रमाणे गुढी उभारूयात. मित्रांनाही असंच वाटलं की महेश थोडा वेळ झोपला की त्याला बरं वाटेल म्हणून. तेव्हा दादा ग्लानीत झोपला तो पुन्हा कधीच न उठण्यासाठी…

बाकी दोन मित्र खाली गावात ही घटना सांगून मदत मिळण्यासाठी म्हणून गेलेले… गावच्या पोलिस पाटलांना ही घटना समजल्यावर त्यांना प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी या सर्व मुलांची चौकशी करण्यास सुरवात केली. कोणाचा अपघात झालाय म्हटल्यावर मुलांनी दादाचे संपूर्ण नांव सांगितले. गावचे पोलिस पाटलांना नाव ओळखीचे वाटलं. कारण आप्पांनी म्हणजे माझ्या वडिलांनी (श्री. आत्माराम भिकाजी सैंदाणे) वेल्हे गावांत शासकिय सेवा बजावित असतांना ७/८ वर्षे बदली निमित्ताने कामकाज केले होते. आप्पा जिल्हा परिषदेमध्ये शासकीय सेवेत होते. आप्पांना त्या गावाने खूप प्रेम दिलेले होते. त्या गावातील सर्वांशी त्यांचे छान सलोख्याचे संबंध होते. आप्पांचे नांव वेल्हे गांवात आदराने घेतले जायचे. दरीत पडलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून आपल्या सैंदाणे भाऊसाहेबांचाच मुलगा आहे ही बातमी वा-यासारखी पसरली. आख्खं गांव मदतीसाठी निघालं. त्यावेळी खोल दरीत जंगली श्वापदं खूप असायची. घटना घडली सकाळी ११/१२ वाजेच्या सुमारास… इतर मित्रांना दादा पर्यंत पोहोचण्यास अर्धा पाऊन तास लागला असावा… तिथे दादा सोबत काही वेळ घालवल्यानंतर घाबरलेली मुले दरीतून वर येऊन पुन्हा खाली गावात जाईपर्यंत दोन तास लागले असावेत… गावात आधी गावकरी व नंतर पोलीस पाटलांपर्यंत ही बातमी पोहोचायला पुन्हा थोडा वेळ लागला असावा… पोलीस पाटलांनी सर्व चौकशी करून गावातील लोकांना मदतीसाठी घेऊन, गडावर जाऊन पुन्हा खाली उतरून जाण्यास मध्य रात्र झाली होती. गावातील काही लोकांना महेशचे पार्थिव तरी मिळेल की नाही अशी भीती वाटत होती. मोठ्या संख्येने गावकरी हाकारे देत गडावर व नंतर खाली दरीत उतरत होते. अख्खा गाव वडिलांच्या प्रेमापोटी मदतीला आला होता. वेल्हे गावात त्या रात्री अनेकांची चूलही पेटली नव्हती असे आम्हाला नंतर समजले. दादाचे पार्थिव बेडशीटची झोळी करून रात्री २.३० ला बाहेर आणले. महेशचे पार्थिव पाहून अख्खा गाव हळहळत होता. रडत होता. दादाने या जगाचा निरोप घेतला ही बातमी आप्पा तिथे पोहोचेपर्यंत त्यांना समजू दिली नव्हती. आणि आमच्या वानवडी येथील नेताजी नगर सोसायटीमध्येही बहुतांश लोकांना दादा आमच्यात राहिला नाही हे माहित असून सुद्धा आम्हालाही दादाचे पार्थिव घरी आणेपर्यंत कळू दिले नव्हते. ती आख्खी रात्र आम्ही आपला दादा परत येईल या आशेवर घालवती होती. तो जखमी अवस्थेत येईल, पण नक्की परत येईल असे वाटत होते. तो आल्यावर आई वडिलांचे न ऐकता आपली मनमानी केली तर देव शिक्षा देतो ही जाणीव आई त्याला करून देणार होती. _(बहुदा आपण आपल्या आई-वडिलांचे ऐकायला हवे होते याची जाणीव त्याच्या आत्म्याला नक्कीच झाली असावी पण तेव्हा वेळ खूपच पुढे निघून गेली होती.)_

त्याच्या या ट्रेकिंगसाठी आई-आप्पा या दोघांनी परवानगी दिली नव्हती. दादाचा वाढदिवस ३० मार्चला होता. तेव्हा आई त्याला औक्षण करायला लागली होती. तेव्हा त्याने खूप हट्टाने “तुम्ही मला ट्रेकिंगची परवानगी द्या तरच मी ओवाळून घेईन नाहीतर नाही”, असे निक्षून सांगितले होते. औक्षणाचे ताट असे अडवणे आईला अजिबात ठिक वाटले नव्हते. आप्पांनीही त्यावेळी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण तो अडमुठेपणाने अडूनच बसला होता. म्हणून तेवढ्यापुरते समजूत म्हणून आईने “हो” म्हटले व त्याचे औक्षण केले. पण आईचा तो शब्द त्याने अगदी खरा म्हणून समजला व त्याच्या सहलीच्या तयारीला लागला होता. ती मुले आठ दिवसांचा शिधा सोबत नेऊन रोज मुक्कामी शिजवून खाणार होते. आई त्याला मुद्दामहून काहीच देत नव्हती. का तर त्याला काही दिले नाही तर तो जाणारच नाही या समजुतीने. पण त्यानेही या सर्व गोष्टींसाठी आईऐवजी मावशीची मदत घेतली होती. पण स्वतःचे जाणे रहित केले नव्हते. लहान असतांना मावशीने त्याला फार लाडात सांभाळले होते. या गोष्टीसाठी नंतर मावशीही स्वतःला दोषी समजत होती. आप्पांनी त्याचे पार्थिव जिल्हा परिषदेच्या जीपमधून आणले होते. आम्ही सगळे आसुसलेल्या नजरेने प्रचंड आशेने त्याच्या येण्याची वाट पहात होतो. त्याकाळी मोबाईलचे प्रस्थ आजच्यासारखे नव्हते होते. त्यामुळे डोळ्यात अक्षरशः प्राण आणून वाट पाहणे चालू होते.😥

सोसायटीत सगळ्यांना आधीच माहिती होते. जेव्हा आप्पांची जीप घरासमोर आली तेव्हा खाली उतरतांना आप्पांनी आईला जोरात हाक मारून खूप मोठ्याने “आपला दादा आता आपल्यात राहिला नाही” म्हणून आदल्या रात्रीपासूनचा राखलेला संयमाचा बांध सोडून टाहो फोडला होता. तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो व अंगावर काटा आणतो.

ती घटना मला आजही काल घडल्यासारखीच आठवते. लाकडासारखा शुष्क कडक झालेला त्याचा देह थंड पडला होता. सुजलेला चेहरा काळा निळा झालेला होता. उजव्या डोळ्याखाली गालावर मोठा ओरखडा होऊन तेथील रक्त सुकले होते. दादाचे पार्थिव अंत्यविधीसाठी घरातून नेण्यापूर्वी मी दादाला बिलगून दादाच्या गालाचा पापा घेतला होता. तो शेवटचा थंड आणि चेतनाविरहीत स्पर्श मला आताही स्पष्ट आठवतो.

आमच्या दादाचा अपघाती मृत्यू गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी झाल्याने तेव्हापासून आजतागायत माझ्या माहेरी गुढी उभारली जात नाही. तो अशा रीतीने गेल्यानंतर पुढे सलग सात वर्षे, त्याचा मोठा मित्रपरिवार व आमच्या कुटुंबातील सर्व सदस्य दरवर्षी तोरणागड येथे जात असू व तेथील लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करत असू.

आम्हा भावंडात तोच मोठा असल्याने आमचे आईवडील सुध्दा त्याला ‘दादाच’ म्हणत असत.

१६ वर्षाचा असल्यापासून दादा माझ्या वडिलांच्या उंचीचा झाला होता. दिसायलाही तो त्यांच्यासारखाच होता. त्याच्या अनेक लकबी या आप्पांसारख्याच होत्या. त्यामुळे तो त्यांचा अभिमान होता. त्याच्या अनेक गोष्टी स्मरणातून जात नाहीत.😓

माझा गोड दादा मी ७/८ वर्षाची असतांना अनेकदा मला पावडर लाऊन, माझे केस विंचरून माझे आवरून देत असे. मला झोप येत नसल्यावर माझे डोके त्याच्या मांडीवर घेऊन मला थोपटणारा माझा दादा आज प्रकर्षाने मला त्याच्या आठवणीने व्याकुळ करीत आहे. तो जर आज आमच्यात असता तर आम्हा सर्वांचे आयुष्य खूप वेगळे राहिले असते. त्या सुंदर आयुष्याच्या कल्पनेत मी बरेचदा रमायचे.

दादाच्या अवघ्या १७ व्या वर्षी अकस्मात जाण्याने आईला आयुष्यातील प्रचंड मोठा धक्का बसला होता. तिथूनच आईच्या आजारपणाला सुरुवात झाली होती व आईने स्वतःच्या सर्व व्याधींकडे दुर्लक्ष केले होते. त्या धक्क्यातून आई शेवटपर्यंत सावरली नव्हती.

या सर्व घटनेला आज ३९ वर्षे पूर्ण झाली. काळ नेहमी पुढे सरकायचे काम करीत असतो. दादाच्या निधनानंतर सुरवातीचा काळ आम्हा सगळ्यांना खूप कठिण गेला. त्यानंतर पुढे कित्येक वर्षे आम्हा दोन्ही भावंडांना ट्रेकिंग किंवा तत्सम गोष्टीं बोलण्याची सुध्दा परवानगी नव्हती. स्वतःच्या खांद्यावरून मुलाचे ‘शव’ वाहून नेणे हे किती दुर्दैवी व मनाच्या प्रचंड ओझ्याचे असते हे केवळ त्या बापालाच माहीत असते. काही दिवसांनी आप्पांनी पुन्हा ऑफिसला जाणे सुरू केले होते. त्यामुळे त्यांना मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून सावरण्यास थोडीतरी मदत झाली होती.

पण आई केवळ घरातील त्या चार भिंतींमध्ये व सतत दादाच्या आठवणींच्या सानिध्यात असल्याने स्वतःला फारशी सावरू शकली नव्हती. आईला पुढे अनेक वर्षे दादा सारखा दिसण्याचा भास होत होता. दादाच्या आवडीचे पदार्थ घरात केले कि तीची व्याकुळ नजर कायम त्याला शोधत रहायची. त्याचे कपडे, त्याच्या सर्व वस्तू तीने कधीच दुस-यांना देऊ दिले नाही. आम्ही दोघे तीच्या कुशीत असलो तरी ती मूक आसवे गाळायची. तेव्हा मी सहावीत तर राजेश नववीत होता. तीला हेही समजत होते कि दादाच्या निधनामुळे आम्हावरही परिणाम होत आहे. सारे कळत असूनही, प्रयत्नांच्या पराकाष्ठेनेही ते तीच्याच्याने वळवून घेतले जात नसल्याने त्याचाही तीला खूप त्रास होत होता. मानसिक, भावनिकरित्या खूप विचित्र कात्रीत तीला अडकल्यासारखे झाले होते. नंतर काही वर्षांनी आई तीच्या मोठ्या लेकराला भेटायला आमच्यातून कायमसाठी निघून गेली.😭

एव्हाना कृपाळू परमेश्वराने त्या दोघांच्याही पवित्र आत्मांस सद् गति दिली असेल.

ॐ शांती.😥🙏🙏

_सौ. माधुरी चव्हाण (सैंदाणे)

 

Share

Pinterest
LinkedIn
Avatar

About Post Author

admin

https://reportertodaynews.com
Happy
Happy
0 0 %
Sad
Sad
1 100 %
Excited
Excited
0 0 %
Sleepy
Sleepy
0 0 %
Angry
Angry
0 0 %
Surprise
Surprise
0 0 %

Spread the love
           

Continue Reading

Previous: आदिवासी चित्रपटांमध्ये आत्म्याच्या अभाव : श्रीनिवास भणगे
Next: Chanakya Mandal Continues Its All-India Legacy of Success in UPSC Examination

Related Stories

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025
2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • Marathi News

2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)

admin May 11, 2025

Recent Posts

  • महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • 2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील
  • संविधानाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार भीमरायांनी प्रत्यक्षात आणले – किरण माने

Recent Comments

  1. Edgarduh on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  2. Trefipt on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  3. Diplomi_aiMl on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  4. RobertRox on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर
  5. Sazrepn on स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचा धगधगता जीवन प्रवास रुपेरी पडद्यावर

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024

Categories

  • Bangali News
  • Contact Us
  • Defence News
  • English News
  • Hindi News
  • Kannada News
  • Marathi News
  • Uncategorized

You may have missed

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 
  • Marathi News

महाराष्ट्राची जनता पोरकी झालेली आहे – हेमंत देसाई 

admin May 12, 2025
अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?
  • Marathi News

अमेरिकेसमोर आपल्याला लोटांगण घ्यावं लागलं, म्हणून बोलणं बंद केलंय का?

admin May 11, 2025
2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)
  • Marathi News

2014 पासून देशाला ग्रहण लागले आहे – अशोक वानखेडे (टायगर)

admin May 11, 2025
देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील
  • Marathi News

देश – धर्मासाठी कसे मरावे हे शंभुराजे यांनी जगाला शिकवले!’ – नितीन बानगुडे पाटील

admin May 10, 2025
  • Advertisement
  • Contact Us
  • News
  • Advertisement
  • Contact Us
  • News
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.