
पुणे : जुन्नर तालुक्यातील १६० आदिवासी मुलींना वसतिगृह प्रवेश मिळावा, यासाठी सातत्याने आंदोलने आणि पाठपुरावा करूनही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने किल्ले शिवनेरी ते वर्षा बंगला, मुंबई ‘पायी लॉंगमार्च’ ऐन उन्हाळ्यात आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास आयुक्त, नाशिक यांच्या सोबत काल (दि.२५) नाशिक येथे बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी सांगितले कि दि. २८ एप्रिलपर्यंत मुलींना प्रवेश दिला जाईल. त्यामुळे दि. २८ एप्रिल रोजी होणारा लॉंगमार्च तात्पुरता स्थगित केला असून, सोमवारी मुलींना प्रवेश मिळाले नाही तर दि. १ मे, महाराष्ट्र दिनी हा लॉंगमार्च सुरू करण्यात येईल.
आदिवासी मुलामुलींसाठी राज्यभरात चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहांच्या २८१३ जागा रिक्त असूनही १६० मुलींना प्रवेश दिला जात नाही. एसएफआयने आतापर्यंत सातत्याने आंदोलन करत, घोडेगाव प्रकल्प कार्यालय अंतर्गत वसतिगृहापासून वंचित विद्यार्थीनींना प्रवेश मिळावा व वसतिगृहाची विद्यार्थी क्षमता वाढविण्यासाठी आंदोलने केलेली आहेत. गेल्या वर्षभरात उपमुख्यमंत्री मा. अजित पवार, तत्कालीन सहकारमंत्री मा. दिलीप वळसे पाटील, आदिवासी विकास मंत्री मा. विजयकुमार गावित आणि विद्यमान आदिवासी विकास मंत्री मा. डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास विभागाचे सचिव मा. वाघमारे साहेब, तत्कालीन आयुक्त मा. नयना गुंडे आणि विद्यमान आयुक्त मा. लीला बनसोड यांच्या सोबत बैठका झाल्या आहेत. परंतु प्रकल्प प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने प्रवेशाचा मुद्दा हाताळल्याने मुलींचे वर्षभराचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.
आयुक्तांनी आश्वासन दिल्यानुसार दि. २८ एप्रिल रोजी प्रवेश मिळाला नाही. तर महाराष्ट्र दिनी दि. १ मे रोजी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सकाळी १० वाजता लॉंग मार्चला सुरुवात होईल. त्यानंतर राजगुरूनगर, लोणावळा, खोपोली, वाशी, दादर मार्गे वर्षा बंगला, मुंबई असा लॉंगमार्चचा मार्ग आहे. दि. १३ मे रोजी लॉंगमार्च मुंबईत पोचेल.
लॉंगमार्चसाठी नागरिकांनी सर्वोतोपरी सहकार्य करावे आणि त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे.